Sunday, 14 July 2019

असं मला वाटत नाही...

असं मला वाटत नाही...
दूर कुठे निवांत क्षणी
आपली भेट होईल
असं मला वाटत नाही..
आता हेच बघ ना
दुरून दिसणारं
धरणी आकाशाचे मिलन
प्रत्यक्षात कधीच घडत नाही..!!
सांजेच्या वेळी दिसणारी
क्षितिजाची रंगत
डोळ्यांना सुखावणारी असली
तरी ती क्षणभंगुर असते
हे ही विसरता येत नाही..
कातरवेळ सारता सरत नाही
आणि चांदण्यांची रंगत
मिटल्या डोळ्यांना कधी दिसणार नाही..!!
किनाऱ्याची स्थितप्रज्ञतां जोपासशील
तर भग्नतेशिवाय
पदरी काहीच पडणार नाही
ओलावा रुजवणारी लाट
पाऊलखुणा पुसून दूर निघून जाईल
अन् हतबल पाहण्याशिवाय
हातात काही उरणार नाही..!!
नाही, असे घडलंच असेही नाही
लाट माघारी वळू शकते
क्षितिज पुन्हा रंगू शकते
अन् चांदण्यांची रंगतही रंगू शकते
पण दृष्टिकोन बदलावयास हवा
टाळी एका हाताने वाजत नाही
तुला इतके तरी कळायला हवे
बाकी काहीच म्हणणे नाही..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment