Tuesday, 29 January 2019

भान..

भान..
जर जाणच नसेल
तर भान राखण्यात काय अर्थ..
चाळणीत पाणी भरण्याचे
खेळ सारे दिसतात व्यर्थ..!!
खुंटलेल्या वाहण्याला
नदी कोणी म्हणत नाही..
अन् डबक्याच्या आटण्याने
दुःखात कोणी कण्हत नाही..!!
नुसतंच खिडकीत बसून
फारतर न्याहाळता येईल केवळ..
पण एकरूपता अनुभवण्यासाठी
जावे लागते पावसाजवळ..!!
दाह कळण्यासाठी
सूर्यास धारण करावे लागते..
तसे शीतलता जाणण्यासाठी
चांदण्यात थोडे भिजावे लागते..!!
मानण्यावर सारं असतं
तर असमाधान कुठे दिसलं नसतं..
खर तर भावनांचं सर्व समाधान
हे कृतीशिवाय विफल असतं..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment