Wednesday, 24 August 2016

II उत्सव आणि उत्साह II

सन 2013 साली लिहलेला लेख त्यावेळी आमचे चिरंजीव केवळ 10 वर्षाचे होते..त्याची बोली अन माझी लेखणी यांनी साधलेला हा उत्सवी मेळ...
================
II उत्सव आणि उत्साह II
================
काल ऑफिस मधून घरी परतलो..पाऊल घरात टाकतो न टाकतो तोच मुलगा म्हणाला पप्पा आज ना आम्ही दहीहंडीचे चार थर कडक लावले..!
त्याचे कडक ऐकून मी तडक उडालो..पण मग स्वतःस सावरत त्याला विचारले
मी : कुठे गेला होता रे थर लावायला..??
मुलगा : ते भोगले काकांच मंडळ आहे ना त्यांच्या तिथे..(भोगले म्हणजे माझे मित्र दरवर्षी मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बिल्डींग जवळ दहीहंडीचे आयोजन करतात.)
मी : बर मग पुढे..
मुलगा : मग काय चार थर लावले ना कडक.. १०० रुपये बक्षीस मिळाले..
मी : मग पुढे..आणखी कुठे गेला होता..?
मुलगा : ते मी मराठी मंडळ आहे ना तिथे..(मी मराठी मंडळ आमच्या विभागात जवळच आहे)
मी : बर मग तिथे काय झाले..??
तिथे सुद्धा चार थर लावले एका झटक्यात..२०० रुपयाचे बक्षीस मिळाले..
मी : पण तुला सांगितले होते ना जास्त लांब जाऊ नको म्हणून..
मुलगा : पप्पा जास्त लांब कुठे, स्टेशन पर्यंतच तर गेलो होतो..तिथे शिवसेनेची दहीहंडी आहे ना शाखेजवळ तिथे..
मी जवळ जवळ किंचाळलोच काय स्टेशन पर्यंत..?
मुलगा : काय पप्पा तुम्ही पण..! स्टेशन तर इथे जवळच आहे.. तुमचे सगळे मित्र सुद्धा होते ना तिथे.. तिथून तर मी आरामात घरी येऊ शकतो..आणि हो..तिथे ना आम्ही पुन्हा चार थर लावले ३५० रुपये मिळाले.. पण पप्पा, आम्ही पाच थर लावले असते ना तर मस्त ट्रॉफी मिळाली असती..पुढच्या वेळी आम्ही पाच थर लावणार म्हणजे लावणारच..
मुलाचे प्रताप ऐकून मी जवळ जवळ उडालोच..आणि कडक ऐकून तर कडक व्हायची पाळी आली..पण मग स्वतःचे बालपणीचे दिवस आठवले..तोच अनुभव मी पुन्हा मुलाच्या रुपात अनुभवत होतो..फरक इतकाचं.. त्यावेळी आम्ही फक्त चाळीत आणि विभागातच हंडी फोडत होतो.. ती सुद्धा वर्गणी काढून....
पण आता मात्र ह्या उत्सवाचे रुपडेच पालटले आहे..आताचा उत्सव म्हणजे निव्वळ घोड्यांची रेस.. बक्षिसांसाठी शरीर रुपी घोडे जिंकण्याच्या लालसेने नुसते दामटवायचे..त्यांना ना जीवाची तमा ना सुरक्षेची काळजी..बस फक्त पळत राहायचे..मग जीव गेला तरी कोण करतोय तमा..?
मी म्हणतो हरकत नाही मुलांनी साहसी असायला..नव्हे ती असायलाच हवीत पण बेफिकीर मुळीच नसावे..कारण तुमची बेफिकिरी तुमच्या जीवावर बेतू शकते..नाही तशी बेतल्याची उदाहरणे सुद्धा आहेत..कालच आमच्या विभागातील दोन तरुण बाईक अपघातात मृत्युमुखी पडले..चटका लावणारी ही घटना..आई वडिलांनी स्वप्न बांधून मुलांना लहानाचे मोठे करावे..आणि अपेक्षा पुर्तीची वेळ येताक्षणी काळाने घाला घालून त्या स्वप्नांचा चक्काचूर करावा..ह्या पेक्षा दुर्दैव ते काय..? तो हृदय पिळवटणारा आकांत अजूनही डोळ्यासमोर तरळतो आहे..सण सरतो..उत्साह मावळतो..मागे उरतो फक्त आकांत..
शेवटी इतकंच सांगू इच्छितो की सण साजरे करा..उत्साह ओसंडून वाहू द्या पण प्रत्येकांनी स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्या..सुरक्षेच महत्व जाणून घ्या आयुष्य सुंदर आहे त्यास कृतीने आणखी सुंदर करा..
जय महाराष्ट्र..
आपलाच,
चकोर...
|| श्री कृष्ण जयंतीच्या तसेच गोपाळकालाच्या हार्दिक शभेच्छां ||

No comments:

Post a Comment