Wednesday, 8 November 2017

|| रामायण ||

|| रामायण ||
=========
रावण नसलेल्या रावणाचे
दहन करून
राम नसलेला राम
आपल्या कुटीत परतला
आणि
सुरवात झाली रामायणाला
लक्ष्मण कुठे परागंदा झाला..
ऐकू येतंय
तो शूर्पणखेवर भाळला
त्याने वेगळा संसार मांडला..
आणि तसंही
रेषेची अडकाठी नको होती सीतेला..!!

मारीच
रामाच्या बाणाने मेला
ही केवळ अफवाच होती तर..?
ऐकण्यात आलंय
त्यानेच पसरवली होती
आता
अनेक रूपं घेऊन
सितेस मोहित करण्या
तोच गल्ली बोळात,
नाक्या नाक्यावर दिसतोय
इतकेच काय
अहो सोशल मीडियाच्या
खिडकीतून सुद्धा डोकावतोय
अन
सीता बिचारी
पुन्हा पुन्हा जाळ्यात फसतेय..!!
परीटाची पिल्लावळ
नित्य करते
बेछूट आरोपांची वळवळ
शिलावर घाव घालत
नसलेला राम
पुन्हा त्यांचीच री ओढतो
अग्नीपरीक्षेच्या कुंडात
सीता अजूनही धगधगते
आणि तो पहा रावण
किती विकट हसतोय
दग्ध झाल्या भावनांचाच
जणू सूड घेतोय
दंतकथा नाही हो ही
हे त्रिकाल सत्य आहे
रामायण अजूनही घडते आहे
वनवास रामाचा केव्हाच संपला
कदाचित तो नव्हताच
मात्र
सीतेचा संपता संपत नाही
आणि
त्यावर कुणी बोलतही नाही..
यासम दुसरी शोकांतिका नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment